Alandi : अस्तित्वाचा अनुभव ज्याला आहे त्यालाच फक्त संत म्हणावे – हभप नामदेव महाराज शास्त्री


एमपीसी न्यूज : श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (Alandi) व श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्त माऊली मंदिरामध्ये आकर्षक फुल सजावट करण्यात आली होती. दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हभप पुरुषोत्तम महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले. सायं 6: 30 ते रात्री 8:30 वा हभप नामदेव महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न झाली.

यावेळी त्यांचे सुश्राव्य कीर्तन ऐकण्यासाठी अनेक भाविकांनी माऊली मंदिरात गर्दी केली होती. यावेळी हभप नामदेव महाराज शास्त्री म्हणाले, आज भगवान ज्ञानोबारायांचा 749 वा जन्मदिवस आहे. आणि उद्यापासून भगवान ज्ञानोबारायांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सुरू होत आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला आपण जिवंत आहोत हे सुध्दा भाग्य आहे. सगळ्यात अवघड कीर्तन असेल तर ते नैमित्तिक कीर्तन. ज्याच्या निमित्ताने कीर्तन करायचे आहे ते अगोदर तुम्हाला माहीत पाहिजे. माऊली माहिती असेल अशी कल्पना सुद्धा करू नका. त्यांनी काय लिहिले आहे याचा समीक्षात्मक अभ्यास पाहिजे.

श्रद्धात्मक नाही, समीक्षात्मक अभ्यास पाहिजे. दोन्ही गोष्टीची आकलन झाल्यानंतर तिची मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे. मांडणी झाल्यानंतर रुचली पाहिजे. या बाबी आल्यानंतर त्याने नैमित्तिक कीर्तन करावे. नाही तर अभंगावर बोलत जावे. जेव्हापासून मानवी जात जन्मला आले असेल तेव्हा एक कुतूहल जन्माला आले. ज्या पृथ्वीवर आपण जन्माला आलो नेमक हे प्रकरण काय आहे? मानव जाती मधील होकार व नकार देणाऱ्या माणसांविषयी व भारत देश व इतर देश याविषयी माहिती त्यांनी दिली.

तसेच ते म्हणाले पंचमहाभूत हा भारताचा शोध आहे. नक्षत्राचा शोध भारताचा आहे. किती नक्षत्र आहे? 27 आहेत. 27 नक्षत्रांचा हरिपाठ आहे हे वारकऱ्याला पण माहित नाही. 27 नक्षत्र असल्या शिवाय मानवी जीवन चालत नाही, त्याला हरिपाठ म्हणतात.

Chinchwad : दहीहंडी निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

ऋषी तर्काने चालणारा, मुनी मनन करणारा आणि जो अनुभव घेणारा आहे त्याला संत म्हणतात. आपल दुर्भाग्य आहे जो आपल्याला आवडतो त्याला संत म्हणतो. हे संत शब्दाच पतन आहे. अस्तित्वाचा अनुभव ज्याला आहे त्यालाच फक्त संत म्हणावे. समजावे तुम्ही म्हणले तरी ते संतच आहेत. नाही म्हणले तरी ते संतच आहे, त्याचे नाव ज्ञानोबाराय. आणि त्या अनुभवामध्ये संतांच्या यादीमध्ये मग एक प्रकार सुरू झाला श्रध्देचा. आणि त्या त्या संताचे जे पाईक झाले ते भक्त झाले. भक्तांविषयी त्यांनी माहिती देत, ज्ञानेश्वरांची ओवी यावर सुश्राव्य कीर्तन केले.

तदनंतर श्री संत ज्ञानेश्वर जन्मोत्सव व भगवान श्री कृष्ण जन्मोत्सव (Alandi) निमित्त ह भ प मारुती महाराज चोरट यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यामध्ये तुकारामाच्या अभंग व गीतेतील श्लोक सांगत ते म्हणाले धर्माचे रक्षण करण्यासाठी परमात्मा जन्म घेतो. प्रत्येक युगामध्ये धर्माचे रक्षण करता देवाने अवतार घेतला.

तसेच संत तुकाराम महाराजांचा अभंग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।भेदाभेदभ्रम अमंगळ ॥1॥ हा अभंग गात ते म्हणाले हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे, माणसामाणसांमध्ये भेद करणे ही अमंगल बाब आहे.हे सांगत त्यांनी धर्म व त्याच्या व्याखेची माहिती दिली. वैकुंठ परमात्मा माऊली येथे प्रकट झाला. फक्त जगाच्या कल्याणासाठी. हे सांगत त्यांनी ज्ञानोबारायांच्या जन्मावेळी भारताच्या परिस्थितीचे वर्णन केले.

भगवान परमात्म्याच्या रूपा मधला संतांच्या रूपामध्ये याविषयी सुश्राव्य कीर्तन केले.तसेच श्री कृष्ण जन्मोत्सवाचे कीर्तन केले.दरम्यान च्या काळात देवस्थान तर्फे भाविकांना पुष्प वाटण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व श्री कृष्ण जन्मोत्सवावेळी रात्री बारा वाजता भाविकांनी श्रींवर पुष्पवृष्टी केली.व श्रींची आरती झाली. उपस्थित भाविकांना सुंठवडा प्रसाद देण्यात आला.मंदिरामध्ये उपवासाची खिरापत वाटप करण्यात आली.तसेच मानकरी व सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले . श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्त श्रींच्या संजीवन (Alandi) समाधीवर मनमोहक असे भगवान श्रीकृष्णाचे रूप साकारण्यात आले होते.

यावेळी देवस्थान प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप,विश्वस्त योगी निरंजननाथ , विश्वस्त भावार्थ देखणे ,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे पा.,राहुल चिताळकर पा., योगेश आरु,स्वप्नील कुऱ्हाडे पा. डी. डी.भोसले पा. घुंडरे पा.रानवडे पा.वहिले पा., वरखडे पा.वाघमारे, रंधवे व ग्रामस्थ मान्यवर ,भाविक उपस्थित होते.