वपु काळे वसंत पुरुषोत्तम काळे

By | March 16, 2023
वपु काळे वसंत पुरुषोत्तम काळे
व् पु काळे विडिओ

प्रिय वपु,

तुम्ही कुठे तरी लिहून ठेवले आहे ना ” परिचयाच्या किंवा नात्यातल्या माणसा पेक्षा, ४ तासाच्या प्रवासात भेटलेली व्यक्ती कधी कधी जवळची वाटू लागते” वपु तुमचे आणि आमचे नाते तरी या पेक्षा काही वेगळे आहे का हो ? आम्हाला जेंव्हा हवे असेल तेंव्हा तुमचे कुठलेही पुस्तक उघडतो आणि मनसोक्त भेटतो?मग तुम्ही कधी प्रवासात भेटता, कधी घरीच रात्रीच्या वेळी उशिरा भेटता, कधी गाडीत भेटता तर कधी चक्क ऑफिस मध्ये भेटता.

तुम्ही जसे आम्हाला भेटता तसे आम्ही पण तुम्हाला प्रत्येक कथेत भेटतोच ना ? तुम्ही प्रत्येक कथा आम्हाला समोर ठेवूनच लिहित होतात ना… तुम्ही तुमचे मन आमच्या जवळ मोकळे केलेत …. आणि आम्ही आमचे !! हिशोब पूर्ण !!!!

नरक म्हणजे काय ? तुम्ही पार्टनर मध्ये किती मस्त एका ओळीत लिहून गेलात ” नको असलेली व्यक्ती न जाणे म्हणजे नरक” कसे सुचत होते हो इतके सोपे लिखाण करायला ?

तसे तुम्ही व्यवसायाने वास्तूविशारद , नोकरी केली मुंबई महानगर पालिकेत आणि नाव कमावले साहित्य विश्वात ! तीनही गोष्टींचा एक दुसऱ्याशी अर्था अर्थी संबंध नाही, पण वपु तुम्हीच हे करू शकत होतात कदाचित महानगर पालिकेतील नोकरी मुळे तुमचा संबंध समजतील वेग वेगळ्या प्रकरच्या लोकांशी आल्या मुळे नकळत कथेला विषय आणि खाद्य मिळत गेले…पण याचा अर्थ असा नव्हे कि महानगर पालिके मुळे तुम्ही साहित्यिक झालात…. असं असतं तर मुंबई पालिकेतील प्रत्येक कर्मचारी कथा लेखक झाला असता…. तुम्ही म्हणाला होतात न ” कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचे वेड रक्तातच असावे लागते”

तुमच्या प्रत्येक कथेत आदर्श नवरा किंवा बायको डोकावते , आणि संपूर्ण कथा कायम मध्यम वर्गीय घरा भोवती फिरत असते ? काय बरे कारण असावे कदाचित तुम्ही जसे वाढलात त्या वातावरणाचा कदाचित परिणाम असेल , आणि तुम्हाला सांगतो वपु, त्या मुळेच तुमच्या कथा आमच्या मनाला जास्त भिडल्या .

आता हेच बघा न

” किती दमता तुम्ही ? या एका वाक्याची भूक प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला असते”…. या वाक्याचे महत्व कळण्या करिता तुमच्या कथा वाचाव्या लागल्या?
आपल्या सौ चे ब्रेन ट्युमर चे आजारपण आणि त्याचा दुःखद शेवट , दिवस रात्र मृत्यूची टांगती तलवार ….बायको हि सखी असते असे सांगत तुम्ही आम्हाला नवरा बायको या नात्याची PHILOSOPHY शिकवलीत…. त्याच नात्या करिता नियती इतकी निष्ठुर पणे का वागली तुमच्याशी ?

कदाचित या अनुभवातून आयुष्याचं सार तुम्ही इतक्या सहज पणे सांगून गेलात – ” प्रोब्लेम कोणाला नसतात ? ते सोडवायला कधी वेळ, कधी पैसा तरी कधी माणसे लागतात “
वपुं तुमच्या दृष्टीकोनाला खरेच दंडवत ! आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन खरोखरचं खुपं काही शिकवणारा आहे….

पत्र हे संवादाचे सगळ्यात प्रभावी माध्यम … आणि मुख्य, पत्र हे असे माध्यम कि ज्यात फक्त दोन लोक संवाद साधतात…. तुम्ही म्हणून गेलाच आहात न “संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात !” म्हणून हा पत्र प्रपंच !

तुम्ही आमच्या पासून खूप दूर गेलात , पण जिथे असाल तिथे नक्कीच सुखी असाल …तुमची कथा ऐकायला आता साक्षात पु ल , प्र के अत्रे , पु भा भावे , बाळासाहेब ठाकरे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व सारखी दिग्गज मंडळी प्रेक्षक म्हणून असतील आणि तुम्ही म्हणत असाल –

आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे. असो…

तुमचा पार्टनर !!